स्थलांतरित कामगारांमध्ये चलबिचल वाढली

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : पोलिसांकडे माहिती देऊन चार दिवस झाले. वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील काढलेय, पण नंबर कधी येणार तेच माहीत नाही. कुठूनतरी गाडी सोडल्याची माहिती मिळते. पण त्यांची गाडी केव्हा सुटणार याबद्दल काहीच कळत नाही. सगळीच अस्वस्थता. मग एक खूणगाठ मनाशी पक्की आहे.. कसेही करून शहर सोडायचे.. मुंबईसह ठाणे, पालघर, वसई-विरार, नवी मुंबईतून बाहेर पडणाऱ्या, रस्त्यावर पाठीला छोटी बॅग लावून अशा दिशाहीन फिरणाऱ्या मजुरांची संख्या गेल्या तीन दिवसांत वाढली आहे.

दहा-वीसच्या समूहाने हे स्थलांतरित मजूर कसेही करून शहर सोडून निघतात. भल्या पहाटे किंवा संध्याकाळ झाली की मुंबईतून निघायचे. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गाने चालत चालत ठाणे गाठायचे. कोणाला नाशिकला जायचेय, तर कोणाला भिवंडीला, कोणाला कल्याणला. पुढे काय करायचे ते ठरलेले नाही. जे होईल ते पाहू, पण हे शहर सोडून जायचे हीच सर्वाची प्रतिक्रिया. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच अगतिकता आणि अस्वस्थता.

मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे स्थलांतरित मजूर ठाण्यात पोहोचले की माजिवडा नाक्यावर गोंधळून जातात. कधीच न पाहिलेला भाग. अनेक रस्ते, उड्डाणपूल पाहून दिशा कळत नाहीत. मग त्याच संभ्रमातून नाशिकच्या रस्त्याऐवजी चुकून घोडबंदर रस्त्यालाही जातात. पुन्हा उलटी पायपीट सुरू होते.

वाटेत ना जेवणाची खात्री ना राहण्याची काही सुविधा. सोबत केवळ एक छोटीशी बॅग. कधी बायको, मुले-बाळेही पाय ओढत चालत राहतात. पाणीदेखील नाही. फक्त चालत राहायचे. एखाद्या परिसरातील समूहाला कोणीतरी सांगते की नाशिकवरून गाडी मिळेल. मग तो जथ्था नाशिकच्या दिशेने जायला निघतो. तर काहीजण भिवंडीला कोणाकडे तरी राहायला निघतात, तर कोणी कल्याणहून गाडी मिळेल या आशेने चालत राहतात..

घर सोडलेलं बरं

हाती मिळेल तेवढं सामान घेऊन घराबाहेर पडलेल्या या स्थलांतरित मजुरांना केवळ गावाची ओढ आहे, असे नाही. कारण ज्या घरात हे मजूर राहतात, तेथे वस्तीतल्या एका खोलीत तीस चाळीसजणांचे वास्तव्य आहे. त्यामुळे सामाजिक अंतराची सोयच नाही. शिवाय गेले दीड महिना हाताला काम नाही आणि पैसाही नाही. त्यामुळे घरभाडे देणे शक्यच नाही. त्यामुळे मुंबई सोडलेली बरं, अशी प्रतिक्रिया हे मजूर देतात.