स्वाध्याय परिवाराचे प्रमुख पद्मभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांनी आयुष्यभर फक्त मनुष्यत्वासाठी कार्य केले. त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी नेहमी मनुष्यच राहिला. त्यामुळे १९ ऑक्टोबर हा त्यांचा शंभरावा जन्मदिवस ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला, असे त्यांच्या सुकन्या आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख सौ. धनश्री तळवलकर (दीदी) यांनी सांगितले. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतलेल्या मुलाखतीत स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख सौ. धनश्री तळवलकर (दीदी) म्हणाल्या की, दादांनी नेहमी माणसाच्या आत्मविकासाचा विचार केला. मनुष्याचे असणे का आहे? त्याने कसे राहिले पाहिजे? कसे वागले पाहिजे? त्याने तसेच का वागले पाहिजे? त्याने कोणत्या मार्गावर चालले पाहिजे? कोणते गुण अंगी रुजवले पाहिजेत? अशा विविध प्रकारे त्यांनी मनुष्यत्वासाठी काम केले. त्यामुळेच त्यांच्या जन्मदिवसाला ‘मनुष्य गौरव दिन’ असे सार्थ नाव देण्यात आले आहे. दादांनी समाजपरिवर्तनासाठी केलेल्या प्रयोगांविषयी दीदी म्हणाल्या, ‘‘योगेश्वरकृषी, मत्स्यगंधा, श्रीदर्शनम, वृक्षमंदिर.. हे सर्व प्रयोगच आहेत. दादांनी काम सुरू केले तेव्हापासून आजपर्यंत फक्त मानवी मनावर प्रयोग करण्यात येत आहे. मी दुसऱ्याचा स्वीकार करतो का? दुसऱ्याच्या मताला स्वीकारतो का? मी मनमोकळेपणाने जगू शकतो का? इतरांशी नाते बांधू शकतो का? या प्रश्नांतून नाते निर्माण करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी दादांनी वेगवेगळे प्रयोग केले, म्हणून आम्ही त्यांना दादांचे प्रयोग म्हणतो.’’ प्रयोगांमुळे भेद नाहीसे होतील का? या प्रश्नाबद्दल दीदी म्हणाल्या की प्रयोगांतून भेद नक्कीच नष्ट होतील. पण भेद नष्ट व्हावेत हा माणसांना भेटण्याचा किंवा प्रयोगांचा हेतू नाही, महिलांना सबल बनवायला आम्ही गावागावांत फिरतो का? नाही. महिलांच्या मताला आज मूल्य नाही म्हणून आम्ही महिला मुक्ती चळवळीसाठी जात नाही. भेद दूर करण्यासाठी जातो का? नाही! माझे इतरांकडे जाणे हे फक्त आणि फक्त भगवंताच्या संबंधाने होते.