यंदाचा दुष्काळ गंभीर असून जनतेला दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांनाही एमआयडीसी क्षेत्रात पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट केले. आयपीएल सामन्यांना सरकारचा विरोध नसून पिण्याचे पाणी मात्र पुरविले जाणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हे सामने अन्य राज्यांत हलविले तरी राज्याच्या महसुलाचे फार मोठे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या समाप्तीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारने पार पाडलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या निम्म्याने कमी राज्य सरकार करीत असलेल्या विविधांगी उपाययोजनांमुळे यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या तीन महिन्यांत निम्म्याने कमी झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.