मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये अपघात झाला होता. या अपघातासाठी हेलिकॉप्टरच्या वैमानिकाची चूक कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकाने हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही ‘टेक ऑफ’चा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचे विमान अपघात तपास पथकाने (एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो) आपल्या प्राथमिक अहवालात म्हटलंय.

लातूर जिल्ह्यातील निलंग्यात २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर तब्बल ८० फुटांवरून खाली कोसळले होते. उड्डाणानंतर काही वेळातच नियंत्रण गमावल्यामुळे हेलिकॉप्टर खाली येत गेले. या दरम्यान हेलिकॉप्टर विजेच्या खांबावरही आदळले होते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने तसे काही घडले नव्हते. सुरूवातीला हेलिकॉप्टरच्या पंख्यातील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, प्राथमिक चौकशीत ‘एएआयबी’नं वैमानिकाच्या चुकीवर बोट ठेवले आहे. अपघाताच्या दिवशी लातूरमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपेक्षा जास्त होता. जास्त तापमानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळा येतो. अशावेळी सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरमध्ये कमी वजन घेऊन उड्डाण करणे अपेक्षित असतं. मात्र, वैमानिकाने या स्टँटर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडे (एसओपी) पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळेच विमाण उड्डाणानंतर लगेच खाली कोसळल्याचे ‘एएआयबीने म्हटले.

‘त्या’ अपघातात हेलिकॉप्टरमधून बाहेर फेकला गेलो होतो

या अपघातात राज्य सरकारच्या ताफ्यातील सहा वर्ष जुने असलेले सिकोर्स्की हेलिकॉप्टर पूर्णपणे निकामी झाले होते. अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे सचिव आणि सनदी अधिकारी होते. या अपघातामधून मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी बालंबाल बचावले होते. त्यानंतर हा अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या नागरी हवाई उड्डाण विभागाचे पथक निलंग्यात दाखल झाले होते. या पथकात नागरी हवाई उड्डाण विभाग मुंबईचे सहायक संचालक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम रेड्डी व इतर पाच जणांचा समावेश होता. या पथकाने दुर्घटनाग्रस्त स्थळाची व हेलिकॉप्टरची पाहणी करून आवश्यक त्या नोंदी घेतल्या होत्या. याशिवाय, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण विभागाच्या विशेष पथकानेही या ठिकाणी चौकशी केली होती. या पथकात वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश होता.

वीज वाहिन्यांजवळ हेलिपॅड उभारले कसे?