एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला घरचा रस्ता दाखविण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक बळकट आणि बलवान झाल्याचे मानले जाते. साऱ्या मंत्र्यांना आता मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री फडणवीस यांच्यापेक्षा आपण ज्येष्ठ असल्याचा दावा करतात. पण दिल्ली दरबारी फडणवीस यांचेच वजन असल्याचे सिद्ध झाले आहे. युतीच्या मंत्र्यांची परंपरा पुढे सुरू.. १९९५ ते १९९९ या काळात युती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातील शोभाताई फडणवीस (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काकू), महादेव शिवणकर, शशिकांत सुतार आणि बबन घोलप या चार तत्कालीन मंत्र्यांवर आरोप झाले होते. यापैकी फडणवीस, शिवणकर आणि सुतार यांना काही दिवस बिन खात्याचे मंत्री म्हणून ठेवण्यात आले होते. सुतार यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता, तर घोलप यांनाही मंत्रिपद सोडावे लागले. ही परंपरा खडसे यांनी पुढे सुरू ठेवली आहे. आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अजित पवार, डॉ. पदमसिंह पाटील, नवाब मलिक, सुरेश जैन, सुरूपसिंह नाईक, धर्मराव आत्राम यांनी राजीनामे दिले होते.