कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपीचा शोध लावण्यास युती सरकारला अपयश आले असून हत्येचा शोध लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेली कमिटी आरोपीचा शोध लावेल हे मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस यांचे विधान निंदनीय असल्याची टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी वाशी येथे केली. केंद्र सरकारला सहा महिन्यात महागाई कमी करण्यामध्ये अपयश आले असून कुठे गेले अच्छे दिन असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. यावेळी नवी मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत त्यांनी दिले. नवी मुंबई महापालिकेची एप्रिल महिन्यात निवडणूक होत आहे. काँग्रेसने या निवडणुकीची जबाबदारी राणे यांच्यावर सोपवली असून सोमवारी त्यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारची कामे काँग्रेस लोकांपर्यत पोहचवण्यात अपयशी ठरल्याची कबुली त्यांनी दिली.गणेश नाईक राष्ट्रवादीतचमाजी मंत्री गणेश नाईक यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असून, ७ मार्चपासून पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार असल्याचे स्पष्ट केले. बेलापूर विधानसभा मतदारसंघात गाफील राहिल्याने पराभव झाल्याची कबुली देतानाच राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवाराने गाफील राहू नये असे असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.