सचिव माहिती देत नसल्याने शासनाची बदनाची होत असल्याचा फडणवीस यांचा आक्षेप शेतकऱ्यांच्याकडून पीकविम्याच्या भरपाईतून कर्जवसुली करण्यासारख्या महत्वाच्या विषयांची माहितीही सचिवांकडून दिली जात नसल्याने शासनाची अकारण बदनामी होते, या कारणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी संतापले. ही तर बौध्दिक दिवाळखोरी आहे, अशी परखड समज देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर व मंत्र्यांवरही आगपाखड केली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सहकार विभागाच्या गलथान कारभारावर आणि अंगणवाडय़ांमधील योजनांचे पैसे थकविल्याबद्दल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सहकार विभागाने काढलेल्या परित्रकावरुन मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळ बैठकीत कमालीचे चिडले. तेव्हा राजकीय दृष्टय़ा महत्वाच्या असलेल्या या विषयांची माहिती प्रसिध्दीमाध्यमांमधून मुख्यमंत्र्यांना समजते. काही सचिव हे सरकारला बदनाम करण्याचेच काम करीत आहेत. अशा महत्वाच्या मुद्दय़ांवर मुख्यमंत्र्यांना न विचारता निर्णय घेतले जातात. त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार केला जात नाही. ही बौध्दिक दिवाळखोरी आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. सहकारमंत्र्यांचा हा विषय असल्याने त्यांचे आपल्या विभागाच्या सचिवांवर नियंत्रण नाही का, असाही मुद्दा उपस्थित झाला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे ४० अंगणवाडय़ांच्या प्रतिनिधींतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले होते. योजनांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित करुन पंकजा मुंडे यांच्याकडे खात्याच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.