विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. नवी मुंबईत भाजपाच्या राज्य परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका कारणासाठी आभार मानायचे आहेत की, त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) वर्ग केला. शरद पवारांचा याला विरोध होता कारण, एनआयएनं तपास केल्यास खरं बाहेर पडेल याची त्यांनी भीती होती.”

दरम्यान, त्यांनी शिवसेनेवर विविध कारणांसाठी हल्लाबोल चढवला. फडणवीस म्हणाले, “माझं तुम्हाला आव्हान आहे की, जर तुमच्यामध्ये मोठा आत्मविश्वास असेल तर तुम्ही पुन्हा निवडणूक लढवा. या निवडणुकीत भाजपा एकटी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हारवेल”

अयोध्येला जा तिथं तुमचं खरं रक्त उफाळून येईल

“अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले त्याला आता यश आले आहे. त्यानंतर आता अनेक लोक अयोध्येला जायला निघाले आहेत, त्यांनी जरुर तिथं जावं आम्ही यासाठी बलिदान दिलं आहे. तिथ गेल्यानंतर तुमचं खरं रक्त उफाळून येईल आणि तुम्ही याला विरोध करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार मांडला त्याची आठवण तुम्हाला प्रभू श्रीराम करुन देतील,” असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

औरंगाबादमध्ये शिवसेना काय करणार हे मला पहायचच आहे – फडणवीस

आम्ही महापालिकांमध्ये विजयाची सुरुवात नवी मुंबईतून करणार आहोत. त्यामुळे नवी मुंबईत आणि औरंगाबादमध्ये भाजपाच महापौर होईल, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेना कोणत्या तोंडानं औरंगाबादमध्ये महाविकासआाघाडी घेऊन येणार आहे. सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना इथं काय करणार आहे हे मला पहायचंच आहे, अशा शब्दांत शिवसेनेला त्यांनी आव्हानं दिलं.