वैज्ञानिक पद्धतीने भूतकाळाचा आढावा घेऊन भविष्याविषयीचे ठोकताळे बांधणारे शास्त्र म्हणजे फ्यूचरॉलॉजी आणि वैज्ञानिक अंदाज व्यक्त करणारे ते फ्यूचरॉलॉजिस्ट (म्हणजे ज्योतिषी नव्हेत) फ्यूचरॉलॉजी व पुरातत्त्वशास्त्र असे सांगते की आधुनिक कालखंडाचे बीजारोपण कैक शतके आधीच झालेले असते. मुंबईच्या नव्हे महामुंबईच्या संदर्भात बोलायचे तर त्याचे बीजारोपण दहाव्या-अकराव्या शतकात झाल्याचे पुरावे आपल्याला तत्कालीन शिलालेख व ताम्रपत्रामध्ये सापडतात. आपण जिला आज महामुंबई म्हणतो ती डहाणूपासून सुरू होते आणि तिची हद्द थेट पनवेलपलीकडे माणगावपर्यंत आहे. कुणी ठरवली ही हद्द आणि तिचे निकष आले कुठून. मानववंशशास्त्र असे सांगते की गतानुशतकांच्या सांस्कृतिक स्मृतीमधून ते नेणिवेच्या पातळीवर येत असते. डहाणूचा मुंबईशी असलेला संबंध घनिष्ठ असून राष्ट्रकूट-शिलाहार कालखंडापासूनच तो पाहायला मिळतो. त्याचे पुरावे तत्कालीन शिलालेख व ताम्रपत्रात आढळतात. ठाणे जिल्ह्य़ात डहाणूजवळ चिंचणी येथे सापडलेली ताम्रपत्रे हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पुरावा होय. डहाणू तालुक्यात चिंचणी येथे १९५५ साली शेतीकाम सुरू असताना एका शेतकऱ्याला नऊ ताम्रपत्रे सापडली. त्यापैकी एकूण पाच दानपत्रे होती. यू. पी. शाह यांनी १९५५-५६ साली त्याची पहिली नोंद केली. त्यानंतर डी. सी. सरकार यांनी एपिग्राफिका इंडिकासाठी सविस्तर नोंद लिहिली. साडेदहा बाय साडेसात इंच आकारातील या ताम्रपत्रांच्या वरच्या बाजूस छिद्र होते, मात्र सर्वसाधारणपणे अशा ताम्रपत्रांसोबत राजमुद्रा सापडते तसे याच्याबाबतीत झाले नाही. या ताम्रपत्रांचे वजन ९०३ ग्रॅम होते आणि ती वाचता येतील अशा सुस्थितीत होती. संस्कृत भाषेचा वापर केलेल्या या ताम्रपत्रांमध्ये नागरी लिपीचा वापर करण्यात आला आहे. त्यातील काही मजकूर गद्यात तर काही पद्यामध्ये आहे. दानपत्रांच्या लेखनामध्ये वाकबगार अशाच व्यक्तीने या दानपत्राचेही लिखाण केलेले असावे, असा तज्ज्ञांचा होरा आहे. प्रसिद्ध शिलाहार राजा च्छिन्तुराजाचा (छित्तराजा) मांडलिक असलेला चामुंडराजा हा संयानपट्टनावर राज्य करीत होता. च्छिन्तुराजाच्या वर्णनासाठी पंचमहाशब्दांची बिरुदावली वापरण्यात आली आहे. त्यात महासाममंतधिपती, तरगपूरपरमेश्वर, सुवर्णगरुडद्धान आहे. मांडलिकराजासाठी निजभूजविक्रमादित्य व अरिमंदालिकादिशा अशी बिरुदे वापरली आहेत. याशिवाय प्रकार राय ध्वंसक असाही राजाचा उल्लेख येतो. लाट राजावरती (विद्यमान, गुजरात) प्राप्त केलेल्या विजयामुळे शिलाहारांच्या दरबारात या स्थानिक राजाचे वजन वाढले होते, असे यावरून दिसते. शिलाहारांच्या शिलालेख व ताम्रपत्रांमध्ये सुरुवातीस गणपतीचे वर्णन येते. या शिलालेखाची सुरुवातही तशीच होते. संयान येथील भगवती देवीच्या कौतुक मठिकेसाठी तेला घाणा दान देणारे असे हे दानपत्र आहे. घाण्याच्या तेलाचा वापर देवीसमोर लावण्याचा दिवा आणि तिथे आलेल्या ब्राह्मण विद्वानांच्या पायाला अभ्यंगासाठी करण्यात यावा असे दानपत्रात म्हटले आहे. शक ९५६ मध्ये भाद्रपद अमावास्येला स्वाध्यायिक असलेल्या अभ्यासक विहडच्या हातावर पाणी देऊन दान देण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या तिथीसंदर्भात विचार केला असता लक्षात येते की सर्वपित्री अमावास्येला करण्यात आलेले असे हे दान आहे. इंग्रजी तारखेनुसार हा दिवस रविवार १५ सप्टेंबर १०३४ येतो. हे दान अतिमहत्त्वाचे असल्याने त्या प्रसंगी उपस्थित मांदियाळीतील नामवंतांचाही उल्लेख यात आहे. त्यात स्थानिक मुख्य कलावंत, स्थानिक अधीक्षक (आधुनिक काळात गव्हर्नर), प्रमुख नागरिक, पार्षद व्यापारी आलिया महार आणि मासूमता श्रेष्ठी केसरी, कक्कल, सोमय्या व वेव्वालैया हे सोनार व्यापारी उवा यांचा उल्लेख आहे. अखेरीस एका मुस्लीम नावाचाही उल्लेख आहे. हा दीर्घकाळ तिथेच स्थायिक झाला होता, यावरून असे लक्षात येते की संयानमध्ये दीर्घकाळ मुस्लीम वस्ती होती. याशिवाय उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार, राष्ट्रकूट इंद्र तिसरा व कृष्ण तिसराच्या कालखंडामध्ये संयान, मंडलावर अरब मांडलिक राजा राज्य करीत होता. त्या कालखंडात उत्तर कोकणात मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम आले. राष्ट्रकुटांनंतर अपराजित शिलाहार राजाने त्यावर विजय प्राप्त केला. त्यानंतर छित्तराजाने चामुंडराजाची नेमणूक इथे मांडलिक म्हणून केली. चामुंडराजा आणि त्याचे वडील विज्जराणक यांना वापरलेली बिरुदे २९ ते ३१ या ओळींमध्ये येतात. महामंडलेश्वर आहवा-निल अशी ही बिरुदे आहेत. आहवा-निल हे लढाईतील मर्दुमकीचे बिरुद आहे. याशिवाय ६४ काळे घोडे दिमतीस असलेला पुण्यवान राजा असाही त्याचा उल्लेख येतो. शिवाय तिन्ही लोकांचे अलंकार धारण करणारा चामुंडराजा असेही ताम्रपत्रात म्हटले आहे. छित्तराजाचे महाअमात्य नागणये आणि महासंधिविग्रहक वावूपैये या मंत्रांबरोबरच उल्लेखाबरोबरच ज्याने हे ताम्रपत्र लिहून घेतले त्या ध्रुव या मामलैया अर्थात तत्कालीन मामलेदाराचाही उल्लेख आहे. यातील तगर म्हणजे आताचे उस्मानाबादेतील तेर आणि लाट म्हणजे आताचे गुजरात. संयान म्हणजे डहाणूजवळचे संजान होय. डहाणूचा त्याही वेळेस मुंबईशी थेट संबंध होताच. ११ व्या शतकात डहाणू व संजानवर झालेल्या हल्ल्यानंतर तिथून परागंदा झालेली मंडळी नंतर थेट मुंबईतील आरे परिसरात येऊन स्थायिक झाली. ती थेट मुंबईतच का आली आणि आरेतच का स्थायिक झाली, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या लेखापुरते बोलायचे तर डहाणूचा मुंबईशी असलेला संबंध गतानुशतकांचा जुना आहे. म्हणूनच त्याचे प्रतिबिंब आधुनिक काळात महामुंबईमध्ये रूपांतरित झालेले दिसते. vinayak.parab@expressindia.com @vinayakparab