अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील त्यावर आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.

“मी कोणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच फार सुरक्षित वाटतं. येथे मी खुलेपणाने माझं मत मांडू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पाहून शिवसेनेप्रती माझी प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडलं आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटतं”, असं अनुराग कश्यप म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “सध्या पाहायला गेलं तर सरकार लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नाही, पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याचा विरोध मी करत आहे”.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असतानाच रोज नवनवीन मुद्दे समोर येत आहेत. त्यामध्येच सुशांतला न्याय मिळावा यासाठी अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने पाठिंबा देत आहे. मात्र यात कंगनाने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. इतकंच नाही तर अलिकडेच तिच्यात आणि अनुराग कश्यपमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.