दिशा प्रकल्पांतर्गत अभ्यासक्रमाची नव्याने बांधणी; कालसुसंगत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धत विकसित नमिता धुरी, लोकसत्ता मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भविष्य अद्याप धूसर असले तरीही मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मात्र नवी ‘दिशा’ मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील मतिमंद शाळांमध्ये अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाबाबत एकसूत्रता यावी यासाठी ‘जय वकील फाऊंडेशन’ आणि राज्य शासनाच्या साहाय्याने ‘दिशा’ प्रकल्प राबवत आहे. याचे ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षण सध्या राज्यभर सुरू आहे. जय वकील फाऊंडेशन ही देशातील पहिली मतिमंद विद्यार्थ्यांची शाळा आहे. यापूर्वी मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात एक ढोबळ आराखडा तयार होता. त्यानुसार प्रत्येक शाळा त्यांच्या स्तरावर अध्यापनाचे कार्य करते. जय वकील फाऊंडेशनने दिशा प्रकल्पांतर्गत कालसुसंगत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धत विकसित के ली आहे. या प्रकल्पाला ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज’चीही मान्यता मिळाली आहे. ‘इंटरेस्ट, टीच अॅण्ड अप्लाय’ या पद्धतीनुसार आधी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न के ले जातील. त्यानंतर शिकलेल्या गोष्टींचे आचरण त्याने करावे यासाठी पद्धतशीर अध्यापनाचा आधार घेतला जाईल. व्हिज्युअल, ऑडिटरी, कायनेस्थेटिक, टॅक्टाइल म्हणजेच ‘व्हीएके टी’ हा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना दृश्यानुभव, श्रवणानुभव, कार्यानुभव आणि स्पर्शानुभव दिला जाईल. व्यावसायिक प्रशिक्षण गट ’ मतिमंद विद्यार्थ्यांच्या वयानुसार ३ ते ६ वर्षे पूर्वप्राथमिक, ६ ते १० वर्षे प्राथमिक, १० ते १४ वर्षे माध्यमिक आणि १४ ते १८ वर्षे पूर्वव्यावसायिक प्रशिक्षण असे गट असतील. ’ प्रत्येक गटात शैक्षणिक आणि कार्यात्मक अशा दोन शाखा असतील. शैक्षणिक शाखेत भाषा, गणित, परिसर अभ्यास, कार्यात्मक अभ्यास या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना संख्या ओळख, अक्षर ओळख, गणितीय क्रिया आणि आकृ त्या, तंत्रज्ञानाचा वापर, खेळ, कला यांचे शिक्षण दिले जाईल. ’ कार्यात्मक शाखेत स्वावलंबी आयुष्य, व्यावसायिक कौशल्ये, संभाषण आणि सामाजिक कौशल्ये असे विषय असतील. याअंतर्गत विद्यार्थ्यांना खाणे-पिणे, स्नायूंची कौशल्ये, पोशाख, शौचालय प्रशिक्षण, स्वच्छता व सौंदर्य, संवाद, इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाईल. पूर्वी मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे होती. मात्र, विशिष्ट अभ्यासक्रम नव्हता. दिशा प्रकल्पांतर्गत रचनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीचा अवलंब के ला जाईल. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी असतात तशी क्रमिक पुस्तके पूर्वी नव्हती. पण दिशा प्रकल्पामुळे शिक्षकांसाठी मार्गदर्शन पुस्तिका आणि विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रिका तयार होऊ शकल्या आहेत. - यामिनी काळे, शिक्षिका,नवजीवन मतिमंद शाळा, औरंगाबाद