राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील कामं करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीच्या मिटींगध्ये पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. तसेच आमदारांनाही बोलावलं होतं. आमदारांची कामे करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पराभूत उमेदवार असं म्हणाले की त्यांना विकासकामे करण्यासाठी निधी कमी प्रमाणात मिळतो. ही त्यांची अडचण आहे.”

“निवडणुका झाल्यानंतर शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांनी सराकर स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन पक्षांनी सरकार स्थापण केले. यापुर्वी निवडून येतांना शिवसेनचा उमेदवार काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेच्या विरोधात निवडून आला. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही राजकीय समीकरण बदलली. मात्र स्थानिक पातळीवर काही प्रश्न निर्माण होतात. स्थानिक पातळीवर जेवढं एकमत व्हायला पाहिजे होतं. तेवढं झालं नाही. एकोपा, समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कार्यकर्ते, नेते या गोष्टी बोलून दाखवतात,”, अशे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आज पहिल्यांदाच….”

मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर अजित पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज (९ सप्टेंबर) झालेल्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. आपल्या काही समस्या मांडत असतात. त्यांच्या ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल. म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार पुढे म्हणाले की, “शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर देखील अनेकदा पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आज देखील लोकांच्या काही समस्यांवर निर्णय घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत. शरद पवार ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत आहेत. त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरिता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.”