संदीप आचार्य

करोना संरक्षित पोशाख एकदा  अंगावर चढवला की एखाद्या भट्टीत असल्याप्रमाणे आम्ही अक्षरश: भाजून निघतो. आत घामाच्या धारा वाहतात आणि समोर रुग्णावर उपचार सुरू असतात.. ही भावना व्यक्त केली केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर दीपक मुंडे यांनी.

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव तसेच सेव्हन हिल व कस्तुरबा रुग्णालयात करोनाशी थेट लढणाऱ्या प्रत्येक डॉक्टरची व्यथा अशीच आहे. ‘करोनाचे रुग्ण ज्या विभागात अथवा अतिदक्षता विभागात असतात तेथे वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद ठेवावी लागते. अन्यथा साथ बाहेर पसरू शकते. अशा अवस्थेत रात्री आम्ही सारे डॉक्टर बारा-बारा तास कसे काम करत असू’, असा सवाल डॉ. मुंडे यांनी एका खुल्या पत्राद्वारे केला आहे.

‘लोकसत्ता’ शी बोलताना डॉ. मुंडे म्हणाले, गेले महिनाभर मी करोना रुग्णांच्या विभागात कधी दिवसा आठ तास, तर रात्री बारा तास काम करीत आहे. एका भयंकर शारीरिक व मानसिक विवंचनेतून आम्ही सारे डॉक्टर जात आहोत. तरीही या आणीबाणीच्या काळात अहोरात्र सेवा बजावत आहोत. आम्ही बहुतेक डॉक्टर २४ ते ३० वयोगटातील आहोत. पण आमच्यातील वयस्कर तसेच मधुमेह आदी आजार असणाऱ्या परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही.

करोनारोधी पोशाख घालणे व काढणे हेही खूप काळजीपूर्वक करावे लागते. चेहऱ्याला एन – ९५ चा मास्क, त्यावर तीन थराचा सर्जिकल मास्क आणि त्यावर चेहरा झाकणारे प्लास्टिकचे कव्हर यामुळे श्वासही नीट घेता येत नाही. प्रचंड गुदमरल्यासारखे होते. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुके जमा होते. त्यामुळे समोर अंधूक दिसते, असेही डॉ. मुंडे यांनी सांगितले.

‘डॉक्टरांकडून जिवाची बाजी’

केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनीही निवासी डॉक्टर, परिचारिका तसेच करोनाच्या लढाईतील प्रत्येक आरोग्य सैनिक हा कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. करोनारोधी पोशाख घालून आठ-आठ तास काम करणे हे आव्हान आहे, असे त्यांनी नमूद केले.