राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शरद पवार यांच्या वाढदिवशी समारंभाचे आयोजन न करता या निधीतून दुष्काळग्रस्तांना मदत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. या दिवशी पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र, यंदा राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात देशवासियांवर संकट आले असताना शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही याचे अनुकरण करीत त्यांच्या वाढदिवशी कोणताही कार्यक्रम न घेता आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही १२ डिसेंबर रोजी शरद पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी १० ते १ या कालावधीत उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहनही पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.