भूजलतज्ज्ञ हिमांशू कुलकर्णी यांची खंत

मुंबई : भूजलाचा वापर ग्रामीण भागात ९० टक्के आणि शहरात ५० टक्क्यांएवढा असला तरी तो प्रामुख्याने लोकांचाच प्रश्न राहिला असून राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जमिनीखालील भूजलाचा अभ्यास न करताच येणाऱ्या सरकारी योजनांचा फारसा लाभ होताना दिसत नाही, असे भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी सांगितले. भूजलाचे जलसुरक्षेतील महत्त्व या विषयावर त्यांनी बदलता महाराष्ट्रमध्ये सादरीकरण केले.

काही वर्षांपूर्वी एक लाख विहिरी खणण्याची योजना आणली गेली. मात्र एवढय़ा विहिरी खणताना भूजलाचा अभ्यासच करण्यात आला नाही. केवळ विहिरी खणून उपयोग नाही तर त्यासाठी भूजलाची पातळी वाढवण्याची गरज आहे. मात्र यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा काहींनी भूजल राखण्यासाठी पाणीवापर कमी केला तर इतर त्या पाण्याचा फायदा घेतील. जमिनीत कोणत्या ठिकाणी पाण्याचा किती साठा आहे त्याचा शास्त्रोक्त पाहणी न करता बंधारे केल्यास त्याचा उपयोग होईलच असे नाही, असे  कुलकर्णी म्हणाले. जमिनीची रचना आणि त्यानुसार भूजल वाढवण्याचे उपाय याचे त्यांनी सादरीकरण केले. भूजलपातळी वाढवण्यासाठी लोकांनी एकत्रित यायला हवे. आर्थिक, सामाजिक स्थिती व मानसिकताही भूजलाची समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची आहे.