दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपुर्ती पुढील वर्षांपासून थेट बँक खात्यावर जमा करणार, असल्याची महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत सोमवारी केली.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपुर्तीचा विषय विधानसभेत आमदार भारत भालके, भिमराव धोंडे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, शुल्क प्रतिपुर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या ९७२ माध्यमिक शाळांपैकी ५१८ शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ७७ व मंगळवेढा तालुक्यातील ३४ शाळांचा समावेश आहे. दहावीच्या २४ हजार १३८ तर बारावीच्या १२ हजार ६१० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त असून, शालेय शिक्षण ८.५० कोटींची तर, समाज कल्याण विभाग ४८ लाखांची प्रतीपुर्ती पुढील १५ दिवसांत करून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात येईल. दुष्काळग्रस्त म्हणुन घोषित केलेले तालुके व महसुली मंडळातील ज्या शाळांचे प्रस्ताव आले नाहीत, अशा शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती देखील शेलार यांनी दिली.

तसेच, शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती सध्या शाळांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब होत होतो. भविष्यात ऑनलाईन पद्धतीने कार्यपद्धती राबविण्यात येईल. ज्यामधे मुलांचे बँक खाते क्रमांक व आवश्यक माहिती प्रवेशाच्या वेळीच गोळा करुन ज्या भागात दुष्काळ जाहीर होईल. त्या भागातील विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर शुल्काची रक्कम पुढील वर्षांपासून जमा करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. तसेच, शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीच्या शासन निर्णयात अधिक स्पष्टता आणुन आजपर्यंत माफ न करण्यात येणारे प्रात्यक्षिक शुल्क सुध्दा शासन माफ करेल ,अशी विद्यार्थ्यांना दिलासा देणारी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली. या चर्चेत आमदार सुरेश हळवणकर, गणपतराव देशमुख आदी सदस्य सहभागी झाले होते.