अतिघाईमुळे रेल्वेगाडय़ांचे नियोजन कोलमडले : मजुरांची फरफट, यंत्रणांची दमछाक

स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेगाडय़ांच्या उपलब्धतेवरून केंद्र आणि राज्य यांच्यात जुंपली आणि मंगळवारी मुंबई, ठाण्यातून शेकडो गाडय़ांचे नियोजन करण्यात आले. मात्र, अल्पावधीत इतक्या मोठय़ा प्रमाणात गाडय़ा सोडण्याच्या घाईमुळे नियोजन कोलमडले. एकीकडे स्थलांतरितांचा महापूर आणि दुसरीकडे पोलीस, बेस्ट, एसटी, रेल्वेसह सर्वच सरकारी यंत्रणांवर ताण, असे चित्र दिसले. त्यामुळे ही परिस्थिती रुळांवर कधी येणार, हा प्रश्न अधोरेखित झाला.

राज्य सरकारने १४५ ठिकाणी गाडय़ा सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेने मंगळवारी १०० गाडय़ांचे नियोजन केले. त्यातील ५० गाडय़ा दुपारी तीनपर्यंत सोडल्या जातील, असे खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरद्वारे जाहीर केले. मात्र, इतक्या गाडय़ांसाठी (प्रत्येक गाडीत साधारणपणे दीड हजार) हजारोंच्या संख्येने प्रवाशांना स्थानकांवर आणण्याची जबाबदारी पेलताना पोलीस, एसटी, बेस्ट यंत्रणांची दमछाक झाली. श्रमिकांना आपापल्या हद्दीतून रेल्वे स्थानकांपर्यंत आणण्यासाठीची वाहनेही अपुरी पडल्याने मालवाहू वाहनांचा आधार घ्यावा लागला. या सगळ्यात सीएसएमटी, ठाणे आदी स्थानकांवर व आजूबाजूच्या परिसरात अंतरसोवळ्याचे तीनतेरा वाजले. मोठमोठय़ा सुटकेस, बॅगांसह असलेली कुटुंबे, छोटे-मोठे सामान घेऊन जाणारे मजूर आणि त्यांची गाडीसाठी लागलेली रांग, प्रतीक्षा यामुळे दिवसभर प्रचंड गदारोळ सुरू होता.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने ऐनवेळी वेळापत्रक जारी केले. दीड हजार प्रवाशांसाठीची रेल्वे सोडणे ही प्रचंड मोठी कसरत असते. या मंडळींशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमा करणे, सीएसएमटी किंवा अन्य स्थानकांपर्यंत नेण्यासाठी बेस्ट, एसटी महामंडळाची वाहने आगाऊ मागवून घेणे, दीड तास आधी रेल्वे स्थानकावर आणणे, प्राथमिक तपासणी, कागदपत्रांची चाचपणी, प्रत्येकाच्या हाती तिकीट देऊन त्यांना रांगेत गाडीत बसवणे या प्रक्रियेला किमान चार ते पाच तासांचा अवधी लागतो. शिवाय मोठे मनुष्यबळही लागते. एकाच दिवशी इतक्या गाडय़ांमधून मजुरांची पाठवणी करण्यासाठी वाहने, जागा, मनुष्यबळाची व्यवस्था करताना आणि सर्व प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था राखून पार पाडताना पोलिसांची तारांबळ उडाली.

दुपारी तीन वाजेपर्यंत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे मार्गावरून राज्यातून ५० गाडय़ा, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८५ गाडय़ा सुटणे अपेक्षित होते. मात्र, आधीचे सोपस्कार पार पाडणे कमी वेळेत शक्य न झाल्यामुळे केवळ १८ गाडय़ा सोडण्यात आल्या. त्यातही अनेक गाडय़ांना कमी प्रतिसाद होता. काही गाडय़ा सोडण्यासाठी पुरेसे प्रवासी न आल्याने त्यांचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत के वळ २७ गाडय़ाच सुटल्या. त्यावर राज्य सरकारने प्रवाशांना पुरेशा संख्येने न आणल्याने गाडय़ा कमी कराव्या लागल्या, असा दावा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.

वसईत प्रवासी महिलेचा मृत्यू

विरार : रेल्वेगाडीसाठी रणरणत्या उन्हात उभ्या राहिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी वसईत घडली. विद्योत्तमा शुक्ला असे या महिलेचे नाव आहे. वसईतून स्थलांतरितांसाठी मंगळवारी ७ गाडय़ा सोडण्यात येणार होत्या. त्यामुळे नालासोपारा पूर्वेत राहणाऱ्या शुक्ला या कुटुंबासह सकाळी सात वाजता वसईतील सनसिटी परिसरातील प्रवाशी थांबा केंद्रात आल्या होत्या. त्यांना जौनपूरला जायचे होते. मात्र, दुपार उलटूनही त्यांना ताटकळतच राहावे लागले. चारच्या सुमारास चक्कर येऊन त्या कोसळल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

स्थलांतरित मजुरांबाबत केंद्र, राज्यांना नोटीस

स्थलांतरित मजुरांच्या दैन्यवस्थेची सर्वोच्च न्यायालयाने अखेर मंगळवारी दखल घेतली. स्थलांतरित मजुरांची परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्यांकडून त्रुटी राहिल्याचे नमूद करत न्यायालयाने केंद्रासह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवली. या मजुरांना तात्काळ प्रवास सुविधा, अन्न आणि निवारा आदी पुरविण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र, राज्यांना दिले. या स्थलांतरितांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबत न्यायालयाने केंद्र, राज्यांना गुरुवापर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

मुंबईत २२ गाडय़ांतून ३३ हजार श्रमिक रवाना

मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबईतून २२ श्रमिक रेल्वे गाडय़ा विविध राज्यांसाठी सुटल्या. त्यातून ३३ हजार स्थलांतरित श्रमिक आपापल्या गावी रवाना झाले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातून ११ तर उपनगरांतील स्थानकांतून ११ रेल्वे गाडय़ा सोडण्यात आल्या. पाठवणीची प्रक्रि या पहाटेपर्यंत चालेल, असेही सांगण्यात आले.

रेल्वेच्या दिमतीला एसटी-बेस्ट

मुंबईतून साधारण दोन दिवसांपूर्वी ७० ते ८० एसटी बस कामगारांसाठी स्थानकापर्यंत दिल्या जात होत्या. परंतु मंगळवारी जादा श्रमिक गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने एसटीला देण्यात आली. त्यानुसार १५० गाडय़ा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बेस्टच्याही दोन दिवसांपूर्वी ४०० बस स्थानकापर्यंत देण्यात येत होत्या. त्यांची संख्या मंगळवारी ९०० पर्यंत गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एसटी व बेस्टवरीलही ताण वाढला.

नियोजन असे होते..

राज्यातून १४५ गाडय़ा सोडण्याचा प्रस्ताव होता. मध्य रेल्वे -१२३, कोकण रेल्वे-१, दक्षिण मध्य रेल्वे-१ अणि पश्चिम रेल्वे-२० असे नियोजन होते. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गाडय़ा सीएसएमटी स्थानकातून ४४, एलटीटीतून ४९, पनवेलमधून ७, पुण्यातून ८ सोडण्याचे नियोजन होते. तर पश्चिम रेल्वेरील वांद्रे टर्मिनस व बोईसरमधून सर्वाधिक प्रत्येकी सात गाडय़ा सुटणार होत्या.

पोलिसांची तारांबळ आणि नाराजी

स्थलांतरितांना आपापल्या राज्यांत जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर पोलीस राज्य शासनाकडे विशेष रेल्वेची मागणी करत होते. परराज्यातील एकाच जिल्ह्य़ात जाणारा सुमारे १२०० प्रवाशांच्या समूहाची यादी हातात आल्यावर अशी मागणी के ली जात होती. मात्र, सुरुवातीच्या काळात रेल्वेने गाडय़ा उपलब्ध करून न दिल्याने मुंबईतील स्थलांतरित श्रमिकांमध्ये अस्वस्थता वाढली आणि मिळेल ते वाहन पकडून ते आपापल्या गावी निघाले. आता निम्म्याहून अधिक पाठवणी पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने सव्वाशे गाडय़ा एकाच दिवशी उपलब्ध करून देण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. १४०० ते १६०० प्रवाशांना रेल्वेत बसवून ती रवाना करणे या प्रक्रि येला किती तास लागतात याची जाणीव आहे का, असा सवाल रेल्वे प्रशासनाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला.