मणक्याला जबर इजा झाल्याने कमरेखाली अधूपणा येण्याची भीती मुंबई : दहीहंडी उत्सवादरम्यान पुरेशा सुरक्षासाधनांविना थरांत सहभागी होण्याची किंमत दोन तरुणांना आयुष्यभरासाठी मोजावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. दहीहंडीचा थर रचण्यात मदत करणाऱ्या ठाण्यातील २६ वर्षीय तरुणाच्या मानेवर थरांतील गोविंदा पडल्यामुळे त्याच्या मानेच्या मणक्याला अस्थिभंग झाल्यामुळे त्याचा कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाला आहे, तर लालबागमधील एका गोविंदालाही अशाच प्रकारे अधूपणा येण्याची शक्यता आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान शनिवारी दिवसभरात मुंबई परिसरातील १९९ गोविंदा जखमी झाले. यातील बहुतांश गोविंदांना किरकोळ दुखापती असल्यामुळे उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले; परंतु ठाण्यातील वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या दिलीप केळसकर याला कायमचे अधूपण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिलीप हा धर्मवीर गोविंदा पथकात सहभागी झाला होता. मानवी मनोरा रचणाऱ्या गोविंदांमध्ये त्याचा समावेश नव्हता. तो थर रचण्यासाठी मदत करत होता. एका ठिकाणी थर कोसळल्यानंतर त्याच्या मानेवर काही गोविंदा पडल्याने मानेच्या मणक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीपच्या हातामध्ये एकतृतीयांश ताकद उरलेली आहे. काही काळानंतर हातामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कमरेखालील भाग पूर्णपणे अधू झाला आहे. कदाचित शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे; परंतु त्यानंतरही कमरेखालील भागामध्ये सुधारणा होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अस्थिभंग विभागाचे प्रमुख डॉ. ए.बी.गोरेगावकर यांनी सांगितले. लालबागच्या श्री साई देवस्थान मंडळाच्या ४१ वर्षीय सुनील सावंत या गोविंदाच्या मानेला थर कोसळल्याने दुखापत झाली आहे. सुरुवातीला त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी शनिवारी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी हिंदुजा रुग्णालयात नेले आहे. त्यांच्या मानेच्या मणक्याला मार लागल्याने कमरेखाली अधू होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.