सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य पोलीस दलातील १,६५७ जण बाधीत झाले आहेत. पोलीस दलात करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत राज्य पोलीस दलातील १७,०९१ अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी १३,८५१ जण करोनामुक्त झाले. राज्यभरात ३,०६४ पोलीस उपचार घेत आहेत. १७६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान पोलीस दलातील बाधितांचा आकडा १,६५७ ने वाढला. त्यापैकी १९ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाला. रविवार, ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरात ५११ अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले.

एकाच दिवशी इतक्या मोठय़ा संख्येने पोलिसांना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनाबाधितांमध्ये मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांची संख्या जास्त होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण बदलल्याचा दावा मुंबईचे नवे सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी केला.

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात जनजीवन पूर्ववत होत असून, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. गणेशोत्सवाआधी खरेदीसाठी आणि अनंत चतुर्दशीला गणेशमूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी होती. पोलिसांची नियमित कामे वाढू लागल्याने पोलिसांमधील बाधा वाढली असा अंदाज आहे.

करोनाभयाने ग्रामीण भागांत ‘जनता टाळेबंदी’

* राज्याच्या ग्रामीण भागांत रुग्णवाढीमुळे करोनाचे भय पसरले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

* कोल्हापूर जिल्ह्य़ात रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक पातळीवर जनता टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. कागल आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये सध्या जनता टाळेबंदी सुरू आहे.

* वाई शहर आणि तालुक्यात १३ सप्टेंबपर्यंत टाळेबंदी लागू आहे. नगरच्या राहुरीमध्ये १० सप्टेंबरपासून आठ दिवस टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला.

* लातूर जिल्ह्य़ात मुरुड येथे सोमवारपासून ‘जनता संचारबंदी’ला सुरुवात झाली. विदर्भातील चंद्रपूर व बल्लारपूर शहरातही गुरुवारपासून ‘जनता संचारबंदी’ लागू राहील.

देशातील रुग्णसंख्या ४२ लाखांवर

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ९० हजार ८०२ रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णसंख्या ४२ लाख, ४ हजार ६१४ वर पोहोचली आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रुग्णसंख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकले. भारतात गेल्या २४ तासांत १०१६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील रोनामुक्तरुग्णांची संख्या ३२ लाख ५० हजार ४२९ झाली असून, ८ लाख ८२ हजार ५४२ रुग्ण उपचाराधीन आहेत.