पुण्याला किंवा नाशिकला रेल्वेने जाताना आबालवृद्धांच्या आकर्षणाचा विषय म्हणजे इगतपुरी किंवा खंडाळ्याचा घाट! या घाटात पावसाळ्याच्या काळात गाडी चालवणे मोठे आव्हान असते. दरड कोसळण्याची भीती इथे नेहमीचीच असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाची, साप-विंचवाची तमा न बाळगता दोन स्थानकांमध्ये सतत गस्त घालण्याचे काम रेल्वेचे गँगमन करतात..

‘हिरव्या हिरव्या रंगाचो झाडी घनदाट, सांग गो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट..’ हे किंवा ‘कशासाठी, पोटासाठी.. खंडाळ्याच्या घाटासाठी’ ही दोन गाणी गुणगुणायला सुरुवात केली की, हिरवाईचा शालू ल्यायलेला खंडाळ्याचा घाट डोळ्यासमोर येतो. नाशिक किंवा पुणे या दोन शहरांमध्ये मुंबईहून जाण्यासाठी इगतपुरीचा आणि खंडाळ्याचा घाट चढावा लागतो. रेल्वेच्या लेखी या दोन्ही घाटांची नोंद थळ घाट आणि बोर घाट अशी आहे. या दोन्ही घाटांमध्ये रेल्वेमार्ग बांधण्याचे काम आव्हानात्मक होते. हा रेल्वेमार्ग बांधल्यानंतर मात्र घाट चढणाऱ्या गाडीच्या खिडकीतून खासकरून पावसाळ्यात निसर्गाची शोभा बघणे, हा अनुभव थक्क  करणारा असतो.

असेच कधी पावसाळ्यात रेल्वेने पुणे किंवा नाशिक येथे जात असताना घाटातली शोभा बघत असाल, तर घाटात मध्येच लाल डगला घातलेले रेल्वेचे दोन कामगार मुसळधार पावसात तोंडात शिट्टी घेऊन उभे असतात. गाडी पुढे जाताना ते शिटी वाजवत गार्ड तसेच लोको पायलटला कोणताही धोका नसल्याची सूचना देतात. संपूर्ण पावसाळाभर दोन्ही घाटांमध्ये एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत हे कर्मचारी गस्त घालत असतात. मग त्या वेळी ते दिवस-रात्र, ऊन-पाऊस यांची चिंता करत नाहीत.

रेल्वेच्या परिभाषेत याला ‘मान्सून पेट्रोलिंग’ म्हणतात. सह्य़ाद्रीचे डोंगर भौगोलिक वयाप्रमाणे अजूनही ‘तरुण’ आहेत, असे मानले जाते. त्यामुळेच ते चंचल असल्याने पावसाळ्यात घाटांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या दरडी कोसळून कोणताही मोठा रेल्वे अपघात अथवा दुर्घटना होऊ नये, यासाठी मान्सून पेट्रोलिंग अत्यावश्यक असते. पाहू या, हे मान्सून पेट्रोलिंग होते कसे..

रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे कामगार प्रत्येक स्थानकावर नियुक्त असतात. पावसाळ्याच्या दिवसात घाटाच्या दोन टोकांना असलेल्या स्थानकांमधील प्रत्येकी दोन कामगार त्यांच्या कामाच्या वेळेत स्टेशन अधीक्षकाकडे येतात. स्टेशन अधीक्षकाकडे असलेल्या डायरीत वेळ टाकून तो सही करतो आणि ही डायरी या दोन्ही कामगारांच्या ताब्यात देतो. ही डायरी आणि पेट्रोलिंगसाठी अत्यावश्यक असलेले सामान घेऊन हे दोन कर्मचारी गस्तीवर निघतात.

या सामानात, पूर्वी आपटी बार मिळायचे तसेच छोटे बॉम्ब, कंदील, एलईडी टॉर्च, हिरवा आणि लाल अशा दोन रंगांचे झेंडे, बॅटरी किंवा कंदील लटकावण्यासाठी बांबू यांचा समावेश असतो. यातील प्रत्येक घटक आणीबाणीच्या प्रसंगी अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याने एकही घटक मागे ठेवला जात नाही. हे सामान घेऊन दोन स्थानकातील हे कर्मचारी घाटात गस्त घालायला निघतात.

दोन स्थानकांच्या मध्ये कुठे भेटायचे, हे रेल्वेच्या कार्यपद्धतीनुसार ठरलेले असते. म्हणजेच खंडाळ्याच्या घाटात गस्त घालताना साधारण मंकी हिल स्थानकाजवळ हे दोन्ही टोकांकडून चालत येणारे कर्मचारी भेटतात. आपापल्या स्टेशन अधीक्षकांनी सह्य़ा करून दिलेल्या डायऱ्यांची अदलाबदल करतात आणि पुन्हा मागे वळून आपल्या स्थानकाकडे चालायला लागतात. वाचताना ही गोष्ट खूप सोपी वाटत असली, तरी प्रत्यक्षात या दोघांना संपूर्ण घाटभर दोन्ही बाजूंचे रूळ, डोंगरकडा आणि दरी या सगळीकडे लक्ष ठेवावे लागते. विचार करा, मुसळधार पावसाळी रात्र आहे.. इतर वेळी दरीखोऱ्यातील एखाद्या गावी मिणमिणणारे दिवेही दिसण्याची शक्यता नाही.. अशा वेळी दोन माणसे घाटात चालत रेल्वेच्या वाहतुकीला कुठेही धोका नाही, याची खातरजमा करत आहेत. कोणत्याही भयपटात शोभेल असा प्रसंग असतो हा!

गस्ती पथक उशिरा परतले, तर..

काही वेळा एखाद्या स्थानकातून गस्ती पथक जाऊ शकले नाही, दुसऱ्या स्थानकातून निघालेले गस्ती पथक भेटीच्या ठिकाणी पोहोचते. काही वेळ वाट बघून समोरचे पथक आले नाही, तर हे पथक चालत पुढील स्थानकापर्यंत जाऊन तेथील स्टेशन अधीक्षकाकडून डायरीवर सही घेते. कधी दोन्ही बाजूची गस्ती पथके एकमेकांना ठरलेल्या ठिकाणी भेटली, पण ठरलेल्या वेळेत आपापल्या स्थानकांमध्ये परतली नाहीत, तर अशा वेळी स्टेशन अधीक्षकाची भूमिका मोलाची ठरते. स्टेशन अधीक्षक ठरलेल्या वेळेपेक्षा दिवसा १५ मिनिटे आणि रात्रीच्या वेळी २० मिनिटे जास्त वाट पाहतो. त्या वेळेत एखादी गाडी आली, तर त्या गाडीच्या लोको पायलटला स्टेशन अधीक्षक प्राधिकार पत्र देतात. या प्राधिकार पत्रानुसार लोको पायलटने गाडी अत्यंत सावधानपूर्वक चालवायची असते. तसेच काही अडथळा दिसला, तर थांबायचे असते. काहीच अडथळा नसेल, तर पुढील स्थानकावरील स्टेशन अधीक्षकांना लाइन क्लिअर असल्याचा संदेश पोहोचता करायचा असतो.

मान्सून पेट्रोलिंगसाठी अगदी आत्ता-आत्तापर्यंत खूप कमी शिकलेल्या लोकांची भरती होत होती. हे कमी शिकलेले लोक कोणत्याही परिस्थितीत आपली गस्त चुकवत नाहीत. वेळप्रसंगी गाडीचा अपघात टाळण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. गेली अनेक वर्षे हे अशिक्षित लोकच लाखो प्रवाशांचे प्राण वाचवत आले आहेत. या अनाम कर्मचाऱ्यांना खरोखरच सलाम!

दरड कोसळली, तर..

आता समजा एका बाजूने निघालेल्या गस्ती पथकाला एखाद्या ठिकाणी दरड कोसळलेली दिसली आणि दगड-धोंडे रूळांवर आलेले दिसले, तर? तर ते दोन्ही कर्मचारी गाडी ज्या दिशेने येतेय, त्या दिशेला धाव घेतात. दरड कोसळल्याच्या जागेपासून सुरक्षित अंतरावर (ज्या अंतराच्या थोडय़ा पुढून ब्रेक लावले, तरी गाडी धोक्याच्या ठिकाणाआधी थांबू शकेल) पहिला कर्मचारी त्याच्याकडील बांबू जमिनीत खोचून लाल बावटा, कंदील किंवा लाल टॉर्च लावतो. दुसरा कर्मचारी आणखी पुढे धावत जात त्याच्याकडे दिलेले ते छोटे फटाके रूळांवर लावतो. त्यासाठी त्याला खास प्रशिक्षण दिलेले असते. या फटाक्यांना दोन्ही बाजूंनी चिमटे असतात. त्या चिमटय़ाने हे फटाके रूळांवर लावावे लागतात. काही कारणाने हे चिमटे तुटले, तर बाजूला पडलेला चिखल थापून ते बसवावे लागतात. चिखल नसेल, तर प्रसंगी मातीत लघुशंका करून चिखल तयार करण्याच्या सूचनाही त्यांना दिलेल्या असतात. हे फटाके गाडीच्या वजनाने फुटतात आणि लोको पायलट व गार्डला धोक्याची जाणीव करून देतात. आणीबाणीच्या प्रसंगी हे फटाके लावणे शक्य झाले नाही, तर गाडी येण्याच्या मार्गावर हातात लाल झेंडा घेऊन धावत जात शिटी मारण्याचे आदेश या कर्मचाऱ्यांना असतात.

रोहन टिल्लू – @rohantillu

tohan.tillu@expressindia.com