विस्तारीत मुंबई शहर असे वर्णन केले जात असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे तसेच कल्याण या दोन लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रचारात बॅनर्सवरील शेरेबाजीव्यतिरिक्त अद्याप कोणताही ठोस मुद्दा नाही. ‘आपला माणूस, ‘गद्दारांना क्षमा नाही, ‘काम करणार २४ तास.. २४ तासात, ‘भुलू नका त्यांना, ज्यांची पाटी कोरी अशा वैयक्तिक टिकाटिपणीमुळे प्रचाराला घोषवाक्यांच्या स्पर्धेची अवकळा आली आहे. देशात सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असलेल्या या प्रदेशातील नियोजनाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशभरात दहा वर्षांत ३६ टक्के लोकसंख्या वाढ नोंदवली गेली, पण त्याचकाळात ठाणे जिल्ह्य़ातील लोकसंख्या तब्बल ५४ टक्क्य़ांनी वाढली. सहाजिकच लोकसंख्यावाढीचा ताण येथील वाहतूक व्यवस्थेवर पडला. उपनगरी सेवांचा दर्जा आणि फेऱ्या वाढविण्याबाबत कमालीची अनास्था दाखवत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाण्यातील प्रवाशांना कायम सापत्नपणाची वागणूक दिली आहे. अजूनही ठाणे शहरापलिकडच्या लाखो नागरिकांना मुंबईत येण्यासाठी उपनगरी रेल्वेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. रेल्वे सेवा ठप्प झाल्यास व्हाया भिवंडी अथवा शीळ फाटय़ाला वळसा घालूनच मुंबईत ये-जा करावी लागते. त्यासाठी टोलचा भरुदड भरावा लागतो. टोल तरी ज्यांच्याकडे वाहन आहे, त्यांनाच भरावा लागतो. मात्र सध्या संपर्काचे सार्वत्रिक साधन झालेल्या मोबाइल सेवेवरील रोमिंगच्या भरुदडामुळे दररोज लाखो नागरिकांचे खिसे काही खाजगी मोबाइल कंपन्या कापत आहेत. मोबाइल विश्वात महाराष्ट्र-गोवा आणि मुंबई असे दोन विभाग करून महाराष्ट्रापासून मुंबई चक्क वगळण्यात आली आहे. सध्या काँग्रेस आघाडी आणि महायुतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना रोमिंगचा सर्वाधिक त्रास होतो. कारण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येथील नागरिकांना वारंवार दोन नेटवर्कमध्ये जावे लागते. मात्र निवडणूक प्रचारात हा मुद्दाच दिसत नाही. त्याऐवजी स्थानिक उमेदवार, आपल्या समाजाचा माणूस, आपल्या शहरातील माणूस अशा भावना भडकाविणाऱ्या मुद्दय़ांवरच राजकीय पक्षांनी प्रचारात भर दिला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या तीन महापालिका आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातही कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर या दोन महापालिका तसेच अंबरनाथ नगरपालिका व अतिशय वेगाने नागरीकरण होणाऱ्या गावांचा समावेश आहे.