ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक विवेक वर्तक यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने येथे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील चार वर्षांपासून ते कर्करोगाने आजारी होते. दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका वासंती वर्तक यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा रासायनिक व अन्य उद्योग व्यवसायांमध्ये बसवून देणे, त्यांच्या चाचण्या करून देणे हा विवेक वर्तक यांचा व्यवसाय होता. पुण्यातून इंजिनीअरिंग केलेल्या विवेक वर्तक यांनी पवईच्या ‘आयआयटी’मधून एम.टेक. पदवी घेतली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी लार्सन अॅन्ड टुब्रो, युनियन कार्बाईड या कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम केले होते. नंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. कर्करोगाबरोबरचा लढा सुरू असताना नियमित औषधोपचार घेऊन ते आपला व्यवसाय सांभाळत होते. ‘कौन बनेगा करोडोपती’च्या खुर्चीवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वर्तक यांच्या धैर्याचे कौतुक केले होते.