गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेता अरमान कोहली पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. गर्लफ्रेंड निरु रंधवा हिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रविवारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अरमानने केलेल्या मारहाणीत निरु रंधवाला गंभीर इजा झाली असून उपचारासाठी तिला कोकिलाबेन रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. दोघेही २०१५ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, अरमानशी कोणाचाच संपर्क होऊ शकत नाहीये. त्याचा मोबाइल फोन स्विच ऑफ असून तो घरीसुद्धा फिरकला नाही. मारहाणीप्रकरणी चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वाचा : ‘काला’च्या प्रदर्शनासाठी रजनीकांत यांची कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे विनंती

अरमानने निरूला मारहाण केल्याची ही काही पहिलीच घटना नाही. फेब्रुवारीमध्ये त्याने केलेल्या मारहाणीत निरुच्या नाकाला इजा झाली होती. मात्र त्यावेळी तिने त्याला माफ केल्याचं म्हटलं जात आहे. अरमानकडून मारहाण झाल्याच्या तक्रारी त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींकडूनही करण्यात आल्या होत्या. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानेही २०१३मध्ये अरमानविरोधात मारहाणीचा आरोप केला होता. बिग बॉस या रिअॅलिटी स्पर्धेतही त्याने सहस्पर्धक सोफिया हयातवर हात उगारल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर तो सुटला. बिग बॉसदरम्यान अरमान आणि काजोलची बहिण तनिषा मुखर्जी यांच्यात जवळीक वाढली. मात्र अरमानच्या तापट स्वभावामुळे त्यांचं ब्रेकअप झालं होतं.