उल्हासनगरमध्ये २३ वर्षांपूर्वी झालेल्या इंदर भटिजा यांच्या हत्येप्रकरणी उल्हासनगरचे माजी आमदार व नगरसेवक सुरेश ऊर्फ पप्पू कलानी यांच्यासह तीन जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजश्री बापट-सरकार यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविले. शनिवारी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
२७ एप्रिल १९९० रोजी कामावर जात असताना इंदर भटिजा यांची त्यांच्या अंगरक्षकाकडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पप्पू कलानी, बच्ची पांडे, बाबा गाब्रीयाल, रिचर्ड, मोहम्मद अरसद आणि डॉ. नरेंद्र रामसिंघानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व आरोपी जामीनावर मुक्त होते. उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरपूर्वी हा खटला संपविण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाला दिले होते. रिचर्ड, डॉ. नरेंद्र यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्ह्य़ाचा कट, खून आदी आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विकास पाटील यांनी काम पाहिले. २३ वर्षांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया भटिजा यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.