चार वर्षांनंतर अपेक्षेनुसार कामगिरी; ‘जीएसटी’चा वाटाही वाढणार महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या जकातीत अखेर वाढ झाली असून चार वर्षांनी जकातीचे ठरविलेले उद्दिष्ट गाठले जाणार आहे. कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किमती व जकातीत केलेली दीड टक्क्य़ांची वाढ यामुळे जकात वाढली असून जकात ७ हजार कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याचा अंदाज आहे. पालिकेच्या या वर्षीच्या जकातीवरून ‘जीएसटी’चा (वस्तू आणि सेवा कर) वाटा ठरवण्यात येणार असल्याने मुंबई महापालिकेला ‘जीएसटी’मध्ये जास्त हिस्सा मिळण्याची शक्यता आहे. शहराच्या जकात नाक्यांवर गोळा होणारा कर आणि कच्च्या तेलावर आकारली जाणारी जकात हे पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख भाग आहेत. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१२-१३ या आर्थिक वर्षांपर्यंत पालिकेचे जकातीचे उत्पन्न दहा ते पंधरा टक्क्य़ांनी वाढत होते. मात्र त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती गडगडल्या आणि पालिकेच्या जकातीची गाडी उतरणीला लागली. २०१३-१४ मध्ये जकातीत नाममात्र ७ कोटी रुपयांची वाढ झाली तरी अंदाजित करापेक्षा हा महसूल कमीच राहिला. त्यानंतर २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये जकातीत घसरण वाढली. २०१५-१६ मध्ये जकातीसाठी ७९०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र मार्चअखेरीस पालिकेच्या तिजोरीत अवघे ६३१६ कोटी रुपये जमा झाले. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने तीन टक्के दराने घेतल्या जाणाऱ्या जकातीमध्येही तूट होणे साहजिक होते. यावर्षी मात्र जकातीच्या सर्वच विभागात जास्त महसूल गोळा झाला आहे. जकात नाक्यांवरील करचोरीला लगाम घातला गेला आहे, त्याचवेळी रेल्वेमधून लपवून आणल्या जाणाऱ्या मालावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने त्यावरील करातही वाढ झाली आहे. या सगळ्यांमधून जकातीचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले. मंगळवार, २१ मार्चपर्यंत ६९२४ कोटी रुपये जकात गोळा झाली असल्याचे ते म्हणाले. या जकात वसुलीचा फायदा पालिकेला भविष्यातही होणार आहे. यावर्षीपासून ‘जीएसटी’ लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी अखेरच्या वर्षांतील जकातीचे उत्पन्न लक्षात घेतले जाण्याची शक्यता असल्याने जकात वाढल्याचा लाभ पालिकेला पुढील काळातही मिळेल, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. यावर्षी, २०१६-१७ या आर्थिक वर्षांत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल या अपेक्षेने जकातीची अंदाजित रक्कम ७ हजार कोटी रुपये ठरवण्यात आली. त्यानंतर १ ऑगस्ट २०१६ पासून कच्च्या तेलावरील कर ३ टक्क्य़ांवरून ४.५ टक्के करण्यात आला, त्याचा अपेक्षित परिणाम दिसत असून गेल्यावेळच्या तुलनेत यावर्षी कच्च्या तेलावरील जकातीत तब्बल ४१ टक्क्य़ांची वाढ झाली आहे, असे कर निर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त बी. जी. पवार यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये लागू केलेल्या निश्चलनीकरणानंतरही पालिकेच्या जकातीवर फारसा परिणाम झाला नाही. २० मार्चपर्यंत पालिकेकडे ६८५६ कोटी रुपये जकात जमा झाली असून त्यातील २१४५ कोटी रुपये कच्च्या तेलाच्या जकातीत मिळाले आहेत. गेल्या वर्षी तेलावरील जकातीतून केवळ १५२० रुपये मिळाले होते. पुढील दहा दिवसात जकातीची रक्कम ७ हजार कोटी रुपयांपलीकडे जाण्याचा अंदाज आहे. जकात चुकवण्यासाठी टेम्पोऐवजी बस जकात कर चुकवण्यासाठी वर्षांनुवर्षे वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात. बुधवारी चक्क बसमधून कापड आणण्यात आले. दहिसर जकात नाक्यावर कपडय़ांनी भरलेली बस पकडून जकात कर वसूल करण्यात आला.