बोरिवलीच्या सीमा पाताडे या गृहिणीच्या हत्येचे गूढ उकलले असून पोलिसांनी याप्रकणी पाताडे यांच्या मुलीच्या ‘फेसबूक’ मित्राला अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने त्याने ही हत्या केल्याचे समजते.
बाभई नाका येथील कृष्णा क्लासिक इमारतीच्या ११ व्या मजल्यावर सीमा पाताडे राहात होत्या. गेल्या शुक्रवारी त्यांची मुलगी मानसी शिकवणीहून घरी आली, तेव्हा सीमा पाताडे यांचा मृतदेह आढळून आला होता. मारेकऱ्याने कपाटातील दागिनेही चोरले होते. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी तपास करून मानसीचा मित्र राज ऊर्फ राजेंद्र करंजीकर (२३) याला अटक केली. तो जोगेश्वरीच्या मेघवाडी येथे राहणारा आहे. जानेवारी २०१४ मध्ये फेसबुकच्या माध्ममातून राजने मानसीशी मैत्री केली होती. ही मैत्री एवढी जवळची झाली की त्याची मानसीच्या घरी ये-जा सुरू झाली. ५ सप्टेंबर रोजी राज त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने कपाटातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमा यांनी पाहताच त्याला हटकले. त्यामुळे राजने पाताडे यांच्या तोंडावर ऊशी दाबून त्यांची हत्या केली आणि कपाटातील ९४ हजार रुपये, सोन्याचे दानिगे आणि मोबाइल चोरला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर राजने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त बालसिंह राजपूत यांनी दिली.