मुंबईतील सभेत अमित शहा यांचा विश्वास ; काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका

महाराष्ट्रात भाजपचे रालोआ (एनडीए) सरकारच पुन्हा तीनचतुर्थाश बहुमताने सत्तेवर येणार, असा आत्मविश्वास व्यक्त करीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले. जम्मू व काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० रद्दबातल केल्यानेच आता हा प्रदेश भारताचा अविभाज्य घटक झाला असून या निर्णयास विरोध करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, असे आवाहन शहा यांनी राज्यातील जनतेला केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपने गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को संकुलात शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी झाल्यावर लगेचच हा कार्यक्रम झाल्याने निवडणूक प्रचारसभेच्या शुभारंभाचे स्वरूप आल्याने भाजपने शक्तिप्रदर्शनही केले.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल अशी कोणतीही राज्ये हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे कधीही बोलले जात नाही. पण कलम ३७० मुळे केवळ जम्मू व काश्मीरबाबत ही परिस्थिती होती. या देशहिताच्या निर्णयाला जम्मू-काश्मीर राज्यातील जनतेसह सर्व राज्यांमधील नागरिकांचे समर्थन असताना मतपेढीच्या राजकारणातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र त्याला विरोध केला. हे कलम म्हणजे दहशतवादाला चिथावणी होती. हा निर्णय घेतल्यापासून अजूनपर्यंत एकही गोळी त्या राज्यात झाडली गेलेली नाही. मोबाइल सेवा बहुतांश पूर्ववत झाली असून संचारबंदीही उठविली गेली आहे. जनजीवन सुरळीत आहे.

जम्मू व काश्मीरचा प्रश्न किंवा ३७०वे कलम हा भाजपसाठी राजकारणाचा विषय नसून देशभक्तीचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र राजकारणातून विरोध करीत आहे. जनसंघाचे अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू व काश्मीरसाठी बलिदान केले. आतापर्यंत या राज्यात ४० हजारांहून अधिक लोक  मारले गेले असल्याने देशाचा विचार करून हे कलम रद्द केले.

स्वराज्यात बहुमत मिळावे

शिवसेनेचा उल्लेख न करता भाजपची व रालोआची सत्ता येणार, असे प्रतिपादन शहा यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण अनेकदा करून त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या या भूमीत ३७० कलम रद्द करण्याच्या देशहिताच्या निर्णयाला समर्थन मिळावे व विधानसभेत जनतेने भाजपला बहुमत द्यावे, असे आवाहन शहा यांनी केले. राज्यातील प्रत्येक घराघरात जाऊन कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती नागरिकांना द्यावी, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

मोदी सरकारने पुन्हा सत्तेवर आल्यावर १०० दिवसांच्या आतच संसदेच्या पहिल्याच सत्रात हे कलम रद्द करून खऱ्या अर्थाने जम्मू व काश्मीर भारताशी जोडले.

-अमित शहा