डिझेल, सुटे भाग व गाडय़ांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने स्कूलबसच्या भाडय़ात सुमारे ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय ‘स्कूलबस चालक – मालक असोसिएशन’ने घेतला आहे.
स्कूलच्या माध्यमातून लक्षावधी विद्यार्थी रोज शाळेत जा-ये करतात. शाळेच्या दर्जानुसार स्कूलबसचे भाडे वेगवेगळे आकारले जाते. पण डिझेल, विमा, सुटे भाग आणि गाडय़ाच्या किमतीमधील वाढीचा फटका बस मालकांना बसत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ करणे अनिवार्य असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. मात्र शासनाने सबसिडी दिली तर भाडेवाढ टळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २३ अटीचे पालन करणे  बसचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये बसला वेगनियंत्रक बसवण्याची प्रमुख अट असून त्यानुसार गाडीचा वेग ताशी ४० किमी. ची करण्याची अट घालण्यात आली होती. पण आजही अनेक बसचालकांनी वेगनियंत्रक बसविलेले नाहीत. तसेच ‘स्कूलबस धोरणा’तील अन्यही अनेक गोष्टींची अमलबजावणी बस चालकांनी केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून त्यांना सबसिडी मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळेच स्कूलबसची भाडेवाढ अटळ मानली जात आहे.
या भाडेवाढीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आह़े