शेतकऱ्यांना अडतीच्या जोखडातून मुक्त करताना शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न देणाऱ्या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. शासनाने शेतमाल विक्रीसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था उभी न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तशी व्यवस्था उभी करेल, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. शेतकरी वर्गाला माल थेट विकता यावा आणि अडतीच्या जोखडातून मुक्त व्हावे, यासाठी शासनाने काढलेला अध्यादेश स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे शेतमाल बाजार समितीच्या माध्यमातून आणण्याच्या बंधनातून शेतकरी मुक्त झाला आहे. मात्र, त्याच वेळी नाशवंत भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था शासनाने तयार ठेवणे आवश्यक होते. अशी व्यवस्था न करताच अध्यादेश काढल्यामुळे एकाच वेळी शेतकरी तसेच ग्राहकांचे नुकसान झाले आहे. या साऱ्यात ग्राहकाला भाजीपाला जास्त दराने घेण्याची वेळ आली असून शेतकरीही उघडय़ावर पडला, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था उभारावी ती न केल्यास मनसे शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उभारेल असे ठाकरे म्हणाले.