सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा आपल्या जमिनी एमआयडीसीठी देण्यास विरोध आहे. अशा शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण होणार नाही तसेच शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांशी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलतना ही माहिती दिली.

साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये काल त्यांना पोलिसांनी अडवलं, त्यानंतर त्यांच्यातल्या ६ शिष्टमंडळाला आज पोलीस आपल्याच गाडीतून मंत्रालयात नेले. सातारा जिल्ह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळ्याहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले आहेत.

मंत्रालयात पोहोचल्यानंतर या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या ७० टक्के मागण्यांची पुर्तता झाली तसेच आपली बाजू समजून घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले आहेत, असे देसाई यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

देसाई म्हणाले, एमआयडीसीचे अधिकारी इथल्या गावांची पहाणी करतील आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतील. हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाही, तर शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमिनी अधिग्रहित होतील. दरम्यान, टप्पा ३ मधील लाभक्षेत्रातील जमिनी अधिग्रहणातून वगळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.