शेतकऱ्यांनी आता आत्मनिर्भर व्हावं असं ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या १९९० च्या सिनेमाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, मी ९० च्या दशकात जीने दो नावाचा एक सिनेमा केला होता. त्यामध्ये मी एका गरीब शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. राजेश सेठी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ही त्या शेतकऱ्याची गोष्ट होती जो शेती करुन पिकवलेलं धान्य बाजारात घेऊन जातो.

तिथे त्याला एक दलाल भेटतो जो त्याच्या हिशोबाने त्या धान्याचे दर ठरवतो. त्याचवेळी तिथे अमरिश पुरी येतात ज्यांनी या सिनेमात जमीनदार साकारला होता. ते सांगतात मी या धान्याचा भाव ठरवतो हे सगळं धान्य माझ्या कोठारात जमा करा. त्याप्रमाणे शेतकरी ते सगळं धान्य जमीनदाराच्या धान्य कोठारात जमा करतो. जे धान्य या शेतकऱ्याने १५० रुपयांमध्ये विकलं होतं ते रेशनच्या दुकानात २५० रुपयांनी मिळतंय हे त्या शेतकऱ्याला समजतं. तो उद्विग्न होतो. मला यातून इतकंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांची अवस्था ही त्यावेळीही वाईट होती.. आणि आजही वाईटच आहे. पण आता जी कृषि विधेयकं पास झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारेल असा विश्वास मला वाटतो आहे. शेतकऱ्याची अडते आणि दलालांच्या दुष्ट चक्रातून सुटका झाली आहे. कधी कधी सिनेमा आणि सत्य स्थिती सारखी असते. तशी इतके दिवस होती. पण नव्या बिलांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. शेतकऱ्यांनी आता आत्मनिर्भर झालं पाहिजे असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.