माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन पाटील यांचे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. एक मितभाषी आणि लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती.भाई मोहन पाटील यांचा जन्म पेण तालुक्यातील वरवने गावात १५ मे १९९५ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. १९७२ साली त्यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोर जावे लागले होते. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शेकापमध्ये प्रवेश केला होता. सलग पाच वेळा ते पेण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. १९८० ते १९९९ या काळात ते आमदार होते. १९९९ मध्ये त्यांनी राज्याचे फलोत्पादन, खारभूमी आणि रोजगार हमी विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी पाहिली.तरुणांचे नेतृत्व करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. पेण, रोहा आणि सुधागड पाली तालुक्यात शेकापची पाळेमुळे रोवण्याचे काम त्यांनी केले होते. आदिवासी समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक जनआंदोलने केली. रायगड जिल्ह्य़ातील महामुंबई सेझविरोधी जनआंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पेण तालुक्यातील हेटवणे धरणासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. तर पेण येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालायाचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले होते.पेणचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील हे त्यांचे चिरंजीव. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने त्यांना वाकृळ येथील राहत्या घरी हलवण्यात आले होते. त्यांची प्राणज्योत गुरुवारी सकाळी मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अन्त्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. वाकृळ येथील स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. भाई मोहन पाटील यांच्या निधनामुळे शेकापचे न भरून निघणारे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.