मुंबई : पथकर नाक्यांवरील टोलवसुलीत पारदर्शकता यावी तसेच या ठिकाणी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने बंधनकारक केलेली ‘फास्टॅग’ यंत्रणेची अंमलबजावणी अद्याप मुंबईच्या वेशीवरील तसेच वांद्रे-वरळी सी लिंकवर होऊ शकलेली नाही. ‘फास्टॅग’च्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेली १५ जानेवारीची मुदतही उलटली असून आता ही सुविधा कार्यान्वित होण्यास महिनाअखेर उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्व पथकर नाक्यांवर १ जानेवारीपूर्वी फास्टॅगची यंत्रणा बसविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधितांना दिले होते. त्यात पुन्हा १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.  या सर्व मुदतवाढीनंतरदेखील मुंबईच्या वेशीवर अजूनही फास्टॅग यंत्रणा कार्यरत झालेली नाही.  ‘सध्या ऐरोली टोल प्लाझा येथे चाचणी सुरू असून, बुधवारपासून वांद्रे-वरळी सी लिंकवर चाचणी सुरू होईल. इतर नाक्यांवर चाचणी पूर्ण झाल्यावर या महिनाअखेपर्यंत फास्टॅग यंत्रणा सर्वत्र कार्यरत होईल’, असे महामंडळाचे सहव्यवस्थापैकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.