पर्यावरणीय बदलांच्या अभ्यासासाठी राज्य परिषदेची स्थापना मुंबई : वातावरणीय बदलांमुळे भविष्यात मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा परिसर पाण्याखाली जाईल व राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढेल, अशी भीती पर्यावरण विभागाने व्यक्त के ली आहे. या बदलांच्या अनुषंगाने कृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या ‘ इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ‘ (आयपीसीसी) या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रावर होणाऱ्या परिणामांवर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले. या वातावरण बदलाचे राज्यावर किती गंभीर परिणाम होतील, याविषयी बैठकीत माहिती दिली. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची दाहकता कमी होण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले ‘ पाच आर ‘ (रिड्यूस,रिफ्यूज, रि यूज, रिसायकल, रिकव्हर) नुसार राज्यात कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी परिषदेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र उष्ण कटीबंधात आहे. वातावरणात २ ते २.५ अंश सेल्सियस तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागरी किनारपट्टी परिसर पाण्याखाली बुडण्याची तसेच मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आयपीसीसीच्या अहवालानुसार ,भारतातील १२ शहरांतील सागरी किनारपट्टीचा परिसर पाण्याखाली जाण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. यात मुंबई शहराचा समावेश आहे. २०५० मध्ये दक्षिण मुंबईतील किनारपट्टीचा भाग पाण्याखाली जाईल, अशी भीती महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी यापूर्वीच व्यक्त के ली होती. कोकणातील किनारपट्टी भागालाही याचा फटका बसेल, अशी शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. जंगलातील मोठे वणवे हे प्राणवायू शोषून घेण्याऐवजी उत्सर्जनाचे स्त्रोत होतील, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. उच्च तापमानात उष्णतेच्या लाटा राज्यात अधिक येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच दिवसाच्या तापामानात अधिक वाढ होऊ शकते. परिणामांची दाहकता वातावरण बदलीय परिणाम आतापासूनच राज्याला जाणवू लागले आहेत. २०१९ मध्ये कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रात महापूर. २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळ, विदर्भात पूर, अतिवृष्टी व अवेळी पाऊस, चालू वर्षात तोक्ते चक्रीवादळ आणि कोकणात पूर व दरडी कोसळल्या. शेतीवर परिणाम झाला आहे. दुष्काळाचे प्रमाण वाढले. शेतीची उत्पादकता कमी झाली. पीके जळण्याच्या घटनांमध्ये वाढ. कीटकांचे हल्ले वाढले. दुभत्या जनावरांकडून कमी उत्पन्न असे परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.