करोनाविरुद्धचा लढा आता घराघरात पोहोचत असून आपल्या जिल्ह्यतील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम परिणामकारकपणे राबवा , असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

जिल्ह्य़ांतील करोनाबाधितांची संख्या वाढते आहे. उपचारार्थ सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या सहा महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आव्हान अजून संपलेले नाही. टाळेबंदी काळात ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. एकूणच करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता करोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्वाचा आहे त्यामुळे आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात  दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील यापुढील काळात वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करावा लागेल असेही मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले. ही मोहीम परिणामकारक राबविल्यास करोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.