देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिक आपले पुरस्कार परत करत असताना आता चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही ‘पुरस्कारवापसी’ सुरू केली आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि पानसरे, कलबुर्गींच्या हत्येचा निषेध व्यक्त करत बुधवारी १० चित्रपट दिग्दर्शकांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत केला आहे.

दिबाकर बॅनर्जी, परेश कामदार यांच्यासह निष्ठा जैन, लिपिका सिंह, आनंद पटवर्धन, कीर्ती नखवा, हर्ष कुलकर्णी आणि हरी नायर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली. मी येथे कोणताही राग अथवा टीका करण्यासाठी आलेलो नाही पण एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले गेले पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे मला मनापासून वाटते. कोसला का घोसला साठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करणे हे माझ्यासाठी सोपे नसले तरी सध्या देशात सुरू असलेल्या या घटना पाहता त्याचा निषेध व्यक्त करणे मला महत्त्वाचे वाटते, असे दिबाकर बॅनर्जी यावेळी म्हणाले. तर, देशातील वातावरण गढूळ झाल्याने अस्वस्थ असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी दिली.

दरम्यान, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आजच १३९ दिवसांनंतर आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. पण, नियुक्त्यांविरोधात लोकशाही पद्धतीने लढा सुरूच राहणार असल्याचेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.