मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांच्या आठवडय़ाचा प्रस्ताव तयार झाला खरा पण वित्त विभागाने काही अप्रस्तुत प्रश्न उपस्थित केल्याने तो मधेच रखडल्याचे समजते. त्यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून नाराजीचे सूर निघत आहेत. संघटनांनीच हा प्रश्न धसास लावावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही शानिवार-रविवार सुटी देऊन पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी संघटना व इतर संघटनांची मागणी आहे.