लाखो ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४१२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याला जाबाबदार असणाऱ्यांना खणून काढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. बँकेतील काही संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केला असून आजपर्यंत पोलिसांनी एकाही संचालकांवर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. लालूप्रसाद यादाव यांचा घोटाळा ९५० कोटी रुपयांचा होता. त्यांना तसेच चार सनदी अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. मुंबै बँकेच्या घोटाळ्याची व्याप्ती एक हजार कोटीपर्यंत असून तात्काळ बँकेवर प्रशासक नेमून गेल्या पाच वर्षांचे लेखापरीक्षण रिझव्‍‌र्ह बँक व सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करून घेण्याची मागणी विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.