चेंबूर टिळकनगरमधील सरगम सोसायटीतील आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. या आगीत मृतांचा आकडा वाढला त्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या गाडयांना जबाबदार धरण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ सरगम सोसायटीच्या दिशेने रवाना झाले. पण घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार करावे लागले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सरगम सोसायटीच्या दिशेने जाणारा रस्ता अरुंद आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाडया उभ्या केलेल्या होत्या. अग्निशमन दलाची गाडी गल्लीमध्ये येऊ शकत नसल्यामुळे त्यांना आग लागलेल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळयाचा सामना करावा लागला.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाडया पार्क केलेल्या होत्या. परिसरातील स्थानिक तरुणांनी गाडी मालकांना गाडया काढण्यासाठी बोलावले. त्यांची काही वेळ वाट पाहिली नंतर स्वत:च त्या गाडया उचलून फुटपाथवर ठेवल्या. जेणेकरुन अग्निशमन दलाच्या गाडीला आत जाता येईल असे स्थानिक रहिवाशी अशोक सातार्डेकर यांनी सांगितले. ते स्थानिक गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.

पूनर्विकास होण्याआधी सरमग सोसायटीच्या दोन मजली इमारतीत ३६ कुटुंब राहायची. पूनर्विकासानंतर आता १५ मजली टॉवरमध्ये १०० फ्लॅट आहेत. अग्निशमन दलाला वेळेत पोहोचता आले असते तर आणखी काही जणांचा प्राण वाचू शकले असते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. या आगीत सुनीता जोशी (वय-७२), भालचंद्र जोशी (वय ७२), सुमन श्रीनावास जोशी (वय ८३ ) या तिघांचा मृत्यू झाला. तर श्रीनिवास जोशी (वय ८६) यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाचा एक जवानाही जखमी झाला.  या आगीत विक्रोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय जोशी यांची आई यांच्या आईचे निधन झाले.