अखेर मुंबईसाठी प्रस्तावित असलेल्या पाच सायबर पोलीस ठाण्यांची जागा निश्चित करण्यात आली असून सोबतच या पोलीस ठाण्यांचे अधिकार, जबाबदारीही आयुक्तालयाने निश्चित केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नोंद गंभीर गुन्ह्य़ांसह दोन ते ५० लाखांपर्यंतच्या ऑनलाइन फसवणुकीचा तपास सायबर पोलीस ठाण्यांतील अधिकारी करणार आहेत. नवी पोलीस ठाणी २६ जानेवारीपासून सुरू होतील.

सध्या मुंबईत वांद्रे-कु र्ला संकुल येथे एकमेव सायबर पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्यावर ताण पडू नये यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर कक्षाची निर्मिती केली होती. या कक्षांमधून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नोंद किरकोळ, सहजपणे उकल होतील अशा गुन्ह्य़ांचा तपास सुरू होता. मात्र सर्व गंभीर प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी सायबर पोलीस ठाण्यावर येत होती. त्यामुळे प्रलंबित तक्रोर अर्जाचा खच वाढू लागला. तपासाचा परिघ देशभर असल्याने उपलब्ध अपुऱ्या मनुष्यबळाआधारे क्लिष्ट तांत्रिक तपास वेगाने करून प्रत्येक प्रकरण हातावेगळे करणे सायबर पोलिसांना शक्य होत नव्हते. मात्र पाच नव्या सायबर पोलीस ठाण्यांमुळे हा ताण कमी होऊ शके ल. किमान सहा प्रकरणांचा तपास एकाच वेळी करणे शक्य होऊ शके ल. शिवाय शहराच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या तक्रोरदारांची वांद्रे-कु र्ला संकु लापर्यंत येण्याची पायपीटही वाचणार आहे.

जागा कुठे?

* गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या इमारतीत (पूर्व उपनगरांसाठी)

* वांद्रे येथील कार्टर रोडवरील अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयात (पश्चिम उपनगरांसाठी)

* कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या आवारात (उत्तर मुंबईसाठी)

* वरळी पोलीस ठाण्याच्या इमारतीत (मध्य मुंबईसाठी)

* डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्याच्या आवारात (दक्षिण मुंबईसाठी)

जबाबदारी काय?

* एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तीन ते चार निरीक्षक, सहा ते १० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३० ते ४० अंमलदार, असे सुमारे १५० ते २०० मनुष्यबळ प्रत्येक पोलीस ठाण्यास जोडून देण्यात आले आहे. त्यात ५० टक्के  महिला अधिकारी, अंमलदार असतील.

* दोन लाख ते ५० लाखांपर्यंतच्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचा सायबर पोलीस ठाण्यांकडून तपास होईल.

दोन लाख रुपयांहून कमी रकमेचा, मात्र जनमानसावर  परिणाम करणाऱ्या फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्य़ाचा तपास सायबर पोलीस ठाण्यांमार्फत केला जाईल.

* हॅकिंग, ऑनलाइन पाठलाग, अश्लिल साहित्याद्वारे बदनामी, सायबर दहशतवाद, खंडणी या गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी सायबर पोलीस ठाण्यांवर असेल.