मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी उत्सवांच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांंसह जनतेने करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सध्या राज्यातील अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये ७० टक्के रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या  निर्बंध वाढविण्याबाबत  कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संख्या कुठे व का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्लय़ाने पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. नागपूरच्याबाबत तेथील करोना परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, प्राणवायूबाबत गेल्या वेळी १३०० मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, आता १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. प्राणवायू निर्मितीच्या ४५० प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहेत. त्यातील २५० उभारले आहेत व उर्वरित प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतील. प्राणवायूची साठवणूक क्षमता वाढविण्यासह डय़ुरा सिलेंडर्सची संख्या वाढवत असून त्यामुळे आपल्याकडे १९०० ते २००० मेट्रिक टनापर्यंत प्राणवायूची उपलब्धता होऊ शकते. ज्यादिवशी ७०० मेट्रिक टनच्या वर प्राणवायूचा वापर होईल, त्यावेळी निर्बंध सुरू करू, असे टोपे यांनी सांगितले.