सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात बसलेल्या भाजपा नेत्यांमध्ये मेट्रो कारशेड मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. याऐवजी मेट्रोचं नवीन कारशेड हे कांजुरमार्गला बांधण्यात येण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या जागेच्या मालकीवरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा नवीन संघर्ष सुरु झाला आहे. आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा ही ठाकरे सरकारची कार्यपद्धती असल्याची टीका केली होती.

आशिष शेलार यांच्या ट्विटवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया देत राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अल्प बुद्ध, बहु गर्वी असल्याचं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्रा आमचा असा सवाल विचारला आहे??

दरम्यान, मेट्रो कार शेड कांजुरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचे असे चित्र आहे असे आम्ही सांगितले होते. शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते, असा आरोप करत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.