रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. यावरून आता निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांची पाठराखण केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे.

“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा !,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांची पाठराखण केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. तसंच यासोबत त्यांनी अर्णब गोस्वामी आणि डेथ ऑफ डेमोक्रेसी हे हॅशटॅगही दिले आहेत.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

आणखी वाचा- अर्णब गोस्वामींच्या वकिलाचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

काय आहे प्रकरण?

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.