छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’तर्फे येत्या ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत शिवरथ यात्रेचे (पालखी सोहोळा) आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे यंदाचे तिसरे वर्ष असून पंढरपूरच्या आषाढी वारीच्या धर्तीवर या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथून ३ फेब्रुवारीस सकाळी ६ वाजता यात्रेस सुरुवात होणार असून या प्रसंगी महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याने रोहिदास हंडे महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर जुन्नरहून निघालेली मिरवणूक वेगवेगळ्या गावांमधून फिरून ७ फेब्रुवारी रोजी किल्ले रायगडावर यात्रेची सांगता होणार आहे. शिवनेरी ते रायगड या दरम्यान आनंदराव पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मर्दानी खेळांचे कार्यक्रम होणार असून संजीवनी महिला शाहिरी पथक पोवाडे सादर करणार आहेत. शाहीर तामशीकार यांचा पोवाडा आणि प्रमोद माडे, रवींद्र यादव, सदाशिव शिवदे, कांचन नेहेरे, धनंजय देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची व्याख्यानेही ठिकठिकाणी होणार आहेत. शाहीर बाळ अवधुत यांचा शिवाजी महाराज यांच्यावरील जागर-गोंधळाचा कार्यक्रम ६ तारखेला पाचाड येथे होणार आहे. ही यात्रा दुचाकी आणि चारचाकी वाहनाद्वारे आयोजित करण्यात आली असून सहभागी होणाऱ्यांना सह्याद्री प्रतिष्ठानकडून सकाळचा नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण मोफत देण्यात येणार असून यात्रेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अशा प्रकारची यात्रा देशात पहिल्यांदाच होत असून यात्रेत जास्तीत जास्त शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि युवकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे मुंबई संपर्क प्रमुख रोहित देशमुख यांनी दिली. यात्रेबाबतची अधिक माहिती rohit.deshmukh99@gmail.com या ई-मेल आयडीवर मिळू शकेल.