औरंगाबादमधून ‘शक्ती’, ‘करिश्मा’ मुंबईतील प्राणिसंग्रहालयात मुंबई : पेंग्विन आणि विविधरंगी पक्षी तसेच नवनवीन प्राणी यांनी गजबजत चालेल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) तब्बल १४ वर्षांनी वाघोबाची डरकाळी कानी पडणार आहे. औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातून वाघाची जोडी बुधवारी जिजामाता उद्यानात दाखल झाली आहे. चार वर्षांचा ‘शक्ती’ आणि सहा वर्षांची मादी ‘करिश्मा’ अशी या पट्टेरी वाघांची नावे आहेत. \ २००६ नंतर आगमन राणीच्या बागेत २००६ पूर्वी पट्टेरी वाघाची जोडी होती. त्यापैकी मादी २००४ मध्ये तर नर २००६ मध्ये मरण पावला. त्याच सुमारास एका स्वयंसेवी संस्थेने राणीच्या बागेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर प्राण्यांसाठी नसर्गिक अधिवास केले जात नाहीत तोपर्यंत उद्यानात प्राणी ठेवण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. सिद्धार्थ उद्यानात १३ वाघ असून त्यापैकी दोन वाघ राणीच्या बागेला देण्यात आले आहेत. या जोडीतील ‘शक्ती’चा जन्म नोव्हेंबर २०१६ मधील, तर ‘करिश्मा’चा जन्म जुलै २०१४ मध्ये झाला आहे. या जोडीच्या बदल्यात राणीच्या बागेतील दोन जोडी ‘चितळ’ आणि दोन जोडय़ा ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत. या वाघांना सध्या निरीक्षणाखाली वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले असून लवकरच त्यांना मुख्य पिंजऱ्यात धाडण्यात येईल, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली. भारताचा राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या पट्टेरी वाघास ‘आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ’ यांच्याद्वारे धोक्यात आलेली प्रजाती म्हणून घोषित केले आहे. जंगलात सांबरासारख्या मोठय़ा हरिण प्रजातींची शिकार वाघ करतात; परंतु लहान हरिण प्रजाती आणि मासे यावरदेखील ते जगू शकतात. वाघांच्या संवर्धनामुळे शाकाहारी प्राण्यांच्या अनियमित लोकसंख्येवर नियंत्रण होते. यामुळे पर्यावरणातील इतर जैविक घटकांचे संवर्धन होते. वाघांचे शेजारी थंड प्रदेशातील ‘पेंग्विन’ दोन वर्षांपूर्वीच राणीच्या बागेत आणण्यात आले. गेल्याच महिन्यात कर्नाटकातील म्हैसूरच्या श्री चमाराजेंद्र प्राणिशास्त्र उद्यान येथून पट्टेरी तरसाची एक जोडी दाखल झाली.