धारावीत करोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचाच इशारा मानला जातो आहे. धारवी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचं कळतं आहे. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान २ ते ३ दिवसांच्या कालावधीत मरकजहून आलेल्या पाच जणांचा संपर्क हा किमान १०० जणांशी आला होता अशीही माहिती मिळते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात आजच ४७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४३ जण हे मुंबई आणि ठाण्यातील आहेत. अशात आता धारावीत चौथा रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.

धारावीत आलेले तबलीगी जमातचे पाच लोक नंतर केरळला गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या धारावीत राहणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यूही झाला. आता याच बलिगा नगर येथील एका महिलेला करोनाची लागण झाली आहे अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली रुग्णसंख्या वाढते आहे. आज सकाळपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात करोनाचे ५३७ रुग्ण आहेत. दरम्यान मरकज सारखे कोणतेही कार्यक्रम महाराष्ट्रात करोनाचं संकट टळेपर्यंत होणार नाहीत असं आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मरकज सारखा कार्यक्रम महाराष्ट्रात होणार होता त्याला परवानगीही मिळाली होती मात्र करोनाचं संकट लक्षात घेऊन ती रद्द करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.