‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकूण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात येत असून यामध्ये ‘आपले सरकार केंद्र’, ‘नागरीक सुविधा केंद्र’, ‘संग्राम केंद्र’ आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांनी सुविधा केंद्रावर एकावेळी गर्दी करू नये. अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रावर कोणालाही पैसे देऊ नयेत. या आठवड्यापासून संबंधित केंद्र चालकांना ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चे अर्ज प्राधान्याने भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित केंद्र चालकांना फॉर्म भरुन देण्याची सुविधा शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी काही तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या अर्जासाठी सुविधा केंद्रावर पैसे घेण्याच्या तक्रारी आल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित केंद्र चालकाला अर्ज भरुन घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना शासनाकडून वेळोवेळी देण्यात येत आहेत. काही केंद्रांवर बायोमेट्रीक मशीन काम करीत नसल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यांच्या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. एकही पात्र लाभार्थी या योजनेतून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासनही देशमुख यांनी दिले.