ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत दहावी पर्यंतच्या मुलींसाठी होती. त्याचबरोबर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. याशिवाय विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलत योजनांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरिता राबवली जाणार आहे. यासाठी वाढीव आर्थिक भार ४४ कोटी रुपये इतका असणार आहे.

६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण आणि निम-आराम बसमध्ये ५० टक्के सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही ४५ टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल ४००० किमी अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५०% पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता ७५% करण्यात येत आहे.

अधिस्विकृतीधारक पत्रकारांना सध्या सर्वसाधारण आणि निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही १०० टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. सिकलसेलग्रस्त, हिमोफीलिया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना १००% प्रवास सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. सध्या १००% अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५०% प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे ६५% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५०% सवलत मिळणार आहे.