पंतप्रधानांच्या मोफत धान्य योजनेप्रमाणे राज्याने स्वतंत्र योजना तयार करुन अन्नसुरक्षेचा शिक्का नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मोफत धान्य द्यावे. त्याचा खर्च आमदार निधीतून करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

पंतप्रधानांच्या योजनेत पिवळी शिधापत्रिका असलेले  लाभधारक व अन्नसुरक्षा शिक्का असलेले प्राधान्य गट शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. मात्र वार्षिक ५९ हजार ते एक लाख रुपये उत्पन्न गटातील केशरी शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात १६ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळत नसून त्यांना पंतप्रधान योजनेचे धान्य दिल्यास सुमारे ४० ते ५० लाख रुपये शासनाला खर्च येईल. तो आमदार निधीतून करावा व राज्यभरासाठी हा निर्णय राज्य शासनाने तातडीने घ्यावा, अशी विनंती  शेलार यांनी केली आहे.