राज्य सरकारच्या पणन संचालकाने व्यापाऱ्यांना मिळत असलेल्या कमिशनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा, बटाटा, भाजी आणि फळे व्यापाऱ्यांनी उद्यापासून चार दिवस बंदचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी येथील बाजारात शेकडो ट्रक भाजी आली आहे. राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून दिवसभरात तब्बल ८२५ ट्रक भाजी आली असल्याची माहिती भाजी व्यापारी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. बंदच्या पाश्र्वभूमीवर अचानक आवक वाढल्याने मुंबईसाठी हा शुक्रवार ‘व्हेज डे’ ठरणार असून किरकोळ बाजारात भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्य़ांनी कमी होतील, असा अंदाज बाजार सूत्रांनी व्यक्त केला आहे. विशेषत: कोबी, फ्लॉवर आणि मटार या भाज्या मोठय़ा प्रमाणात मुंबईत आल्या आहेत.
दरम्यान, कमिशन कपातीच्या निर्णयासंदर्भात फेरविचार करण्यासाठी राज्य शासनाने अभ्यासगट स्थापन केल्याने व्यापारी बंद आंदोलन फार ताणणार नाहीत. एक दिवस बंद पाळून ते मागे घेतले जाईल, असे बोलले जाते. सध्या याच मुद्दय़ावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने तेथील भाजी मोठय़ा प्रमाणात मुंबईत आली आहे.